Saturday 20 April 2024

भावनिक गुंतवणूक

 परवा आमच्या कंपनीतल्या एका मुलीच्या लग्नाची पोस्ट टाकली तर त्यावर माझा मित्र सदानंद बेंद्रे याने माझी सहकाऱ्यांबरोबर असणारी भावनिक गुंतवणूक यावर लिहायला सांगितलं. म्हणून ही पोस्ट. 

अगदी खरं सांगायचं तर इतर गुण अवगुणाप्रमाणे कंपनीतल्या सहकार्यांबरोबर ची नाती आणि भावनिक गुंतवणूक ही पण वयोमानाबरोबर इव्हॉल्व्ह होत गेली आहे. जेव्हा कंपनी लहान होती, तेव्हा नैसर्गिक होतं की त्याला मी कुटुंब समजायचो. त्यामुळे माझे सहकारी हे फॅमिली मेंबर प्रमाणे असायचे. त्यांचे प्रश्न हे माझे प्रश्न व्हायचे. त्यांनी ते जर मला सांगितले नाही तरी मला त्यांचा राग यायचा. त्यांना मी मग आउट ऑफ वे जाऊन मदत पण करायचो. पण त्याचा परिणाम असा झाला की मी त्यांच्या बाबतीत भयंकर पझेसिव्ह व्हायला लागलो. त्यांनी कंपनी वगैरे सोडली की खूप डिस्टर्ब व्हायचो. थोडक्यात मी त्यांना जी मदत करायचो आणि त्यांना कौटुंबिक रिलेशन मध्ये बांधायचो, या बदल्यात त्यांच्या कडून मी काही अपेक्षा ठेवायचो. आणि त्या पूर्ण नाही झाल्या की मला स्वतःला भयंकर मानसिक त्रास व्हायचा अन त्यातून मी कधी आक्रस्ताळेपणा पण करायचो. कदाचित माझ्या वागण्यातून हे प्रतिध्वनीत पण होत असेल की मी हे सगळं तुमच्यासाठी करतो आहे. 

जसजसे या मानवी नात्यांचे भरेबुरे अनुभव यायला लागले तसा मी पण कंपनीचा कर्ता म्हणून इव्हॉल्व्ह होत गेलो. त्यातून मला जबरदस्त शिकवण मिळाली आणि मी काही धडे घेतले. एकतर न मागता मदत देणं बंद केलं. आणि मुख्य म्हणजे ज्या मदतीतून माझ्या मनात अहंभाव तयार होईल अशी मदत करणं बंद केलं. हे जरी करत गेलो तरीही माझ्या सहकार्याबद्दल असणारं माझं कर्तेपण हे अबाधित राहिलं. फक्त त्यातून येणाऱ्या पझेसिव्ह फिलिंगला तिलांजली दिली. मी सेटको परिवाराचा प्रमुख आहे आणि माझ्या लोकांची काळजी घेणे हे माझं आद्य कर्तव्य आहे ही भावना मनात प्रबळ होत गेली. याची सगळ्यात जबरदस्त अनुभूती लागोपाठच्या दोन घटनांमधून झाली. 

पहिली घटना म्हणजे ७ जुलै २०१९ रोजी झालेला तो भीषण अपघात अन त्यात गमावलेले माझे चार सहकारी. ज्या घटनांमुळे तुझ्या स्वभावात आमूलाग्र बदल झाला अशा तीन घटना सांग असं मला कुणी विचारलं तर या अपघाताचा मी उल्लेख करेल. त्या आघातातून सावरताना माझ्या क्रायसिस मॅनेजमेंट ची कसोटी लागली.

आणि दुसरी कसोटी करोना काळात झाली. मला सांगायला आनंद होतो आणि थोडा अभिमान पण वाटतो की त्या काळात आलेल्या अनेक संकटांना सामोरे जाताना माझे लोक आणि ते संकट यांच्या मध्ये खंबीर पणे उभा राहिलो. पण हे सगळं करताना मी लोकांसाठी नव्हे तर माझ्या आनंदासाठी मी करतोय हे मनावर सातत्याने बिंबवित राहिलो. 

या सगळ्या प्रोसेस मध्ये हे झालं की माझ्या मनात माझ्या सहकार्याबद्दल प्रेम तर पूर्वीसारखंच आहे पण त्यात एक मलाच हवीहवीशी वाटणारी निरपेक्षता आली. आजही पालकत्वाची भूमिका तशीच आहे पण त्यातून येणाऱ्या मालकी हक्क भावनेला मी हद्दपार करू शकलो. 

या सगळ्याचा फायदा असा झाला की माझ्या मनात एम्प्लॉयी आणि एम्प्लॉयर या नात्याबाबतीत खूप स्थितप्रज्ञता आली. ज्यांच्या बरोबर माझे सिद्धांत सिंक झाले आहेत त्यांना मी काही गोष्टी अधिकारवाणीने सांगतो पण त्याउपरही कुणाला माझं म्हणणं पटलं नाही तर त्यांच्या विचारांचा आदर करण्याची मानसिकता मी बाळगून आहे. 

तर असं आहे. थोडं कॉम्प्लेक्स वाटेल कुणाला. पण माझ्या मनात माझ्या सहकार्यांबद्दल प्रचंड प्रेम आहे. त्याबदल्यात येणारा मात्र विमोह मी त्यागला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मानसिक स्टेटस मी खूप एन्जॉय करतो आहे. 

Monday 15 April 2024

विरोध

 विनायक पाचलग च्या थिंक बँक वर घेतलेल्या माझ्या मुलाखतीचं कवित्व तसं संपलं होतं. कौतुक पण झालं, मुलाखतीवर यु ट्यूब वर काही विरोधी प्रतिक्रिया पण आल्या "म्हणजे हा काय बडबड करतोय. स्वतः लोकांना किती पगार देतो" वगैरे वगैरे. 

मुलाखत एअर झाल्यावर दहा एक दिवसांनी मला एक फोन आला, माझ्या एका जुन्या मित्राचा. अनेक वर्षात त्याचा अन माझा काही संवाद पण  नाही आहे. भेटणं तर दूर पण फोन कॉल पण नाही. त्याचा फोन आला आणि त्याची सुरुवातच 

"काय अर्धवट ज्ञान घेऊन मुलाखत देणारे तथाकथित विचारवंत" अशी झाली. मी गांगरलोच एकदम. त्यानंतर तो जे काही बोलत होता, त्याची मला काही टोटल लागत नव्हती. सुरुवातीला राग आला, पण नंतर त्याच्या बोलण्याची गंमत वाटायला लागली. कारण मी जरी फार काही कर्तृत्ववान वगैरे नसलो तरी माझ्या या मित्राने आयुष्यात भरीव केल्याचं आठवत नाही. किंबहुना कामाच्या तराजूत माझं वजन किलोभर भरत असेल तर मित्राचं छटाक पण होणार नाही. तरीही मला फटकवायचा त्याचा कॉन्फिडन्स वाखाणण्याजोगा होता. 

माझा एक तर स्वभाव असा आहे की मला एखाद्या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तरीही समोरचा दुप्पट आत्मविश्वासाने जर सांगत असेल "अरे तुला माहिती नाही, मध्य प्रदेश ची राजधानी  लखनौ आहे, भोपाळ नाही" तर मी "असेल बुवा" असं म्हणून मूग गिळून गप्प बसतो. त्या फोन मध्येही मी गप्प बसलो. 

ही अजून एक सोशल मीडियाची देन आहे. दुसर्याने काही मत व्यक्त केलं असेल अन त्याला विरोध करायचा असेल तर विरोधी मत व्यक्त करायचं नाही तर "व्यासंग वाढवा", "गेट वेल सून", "कडक गांजा कुठं मिळतो" किंवा माझा मित्र म्हणाला तसा "अर्धवट माहिती घेऊन काहीही बरळू नका" अशी काही दुसऱ्याची खिल्ली उडवणारी दीड शहाणपणाची वाक्यं फेकायची. विरोध व्यक्त करण्याचा आपण वापरतो त्यापेक्षा चांगली पद्धत असते हे लोकांच्या गावीही नसतं. 

असो. माझे बिझिनेस कोच म्हणतात तसं "there is a way of living life.....And there is always better way of living life." विरोध करताना पण हे ध्यानी ठेवावं असं मला वाटतं. अर्थात नेहमीप्रमाणे..... आग्रह नाहीच. 

(पोस्ट लिहिण्यासाठी दोन कारणं झालीत. एका संयमित अकौंट वर व्यासंग वाढवा...बरळू नका अशी एका फेक अकौंट ने दिलेली कॉमेंट पाहिली आणि योगायोगाने पोस्ट त्या गावाहून लिहितो आहे जिथून माझ्या मित्राचा फोन आला होता. जमलं तर त्याला भेटून आज संध्याकाळी कोकम सरबत पिताना त्याच्याशी चर्चा करावी म्हणतोय) 

Friday 12 April 2024

मुविंग ऍस्पिरेशन्स

 सेकंड जनरेशन इन्ट्रप्रेन्युअर ही एक कैचीत पकडली गेलेली जमात असते. बाहेरच्या लोकांना वाटत असतं, यांना काय कमी आहे? सगळं रेडी प्लेट मध्ये तर मिळालं आहे. बोर्न विथ सिल्व्हर स्पून वगैरे. हे जर खरंच झालं असेल तर या दुसऱ्या पिढीच्या मनात कॉम्प्लेसन्सी येते आणि व्यवसायाची वृद्धी थांबते. आणि दुसरीकडे अशीही परिस्थिती असते की वडिलांच्या कार्यपद्धतीमुळे एक संस्कृती तयार झालेली असते, जी या नवीन पिढीला झेपत नाही. पहिल्या पिढीच्या उद्योजकाने तयार केलेले सहकारी मालकाच्या मुलाला किंवा मुलीला सहजासहजी स्वीकारत नाहीत. 

पण उद्योग उभा केलेली पहिली पिढी आणि त्याच व्यवसायात उतरलेली त्यांची दुसरी पिढी यांच्यात समन्वय असेल तर अनेक वर्षांची लिगसी तयार होणारे उद्योग उभे राहतात हे एव्हाना आपल्याला रिलायन्स, बजाज, बिर्ला, महिंद्रा या उदाहरणावरून माहिती आहेच. अर्थात या लोकांनी दोन पिढ्यातील विचारांच्या तफावतीमुळे तयार होणारे प्रॉब्लेम्स हे प्रोफेशनल्स घेऊन सोडवले आहेतच. ही दूरदृष्टी छोटे उद्योग दाखवत नाहीत. किंबहुना त्यामुळेच ते छोटे राहतात. 

या पार्श्वभूमीवर मला एक पुस्तक हातात आलं, श्री दत्ता जोशी लिखित "मुव्हिंग ऍस्पिरेशन्स", ज्यामध्ये सेकंड जनरेशन इन्ट्रप्रेन्युअर च्या तब्बल पंचवीस स्टोरीज आहेत. त्या कथांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. 

एक जैन इरिगेशन सोडलं तर बाकी सगळ्या केसेस या लघु आणि मध्यम उद्योगांच्या आहेत. पण त्यातील बहुतेक उद्योग या एम एस एम ई तुन लार्ज उद्योगसमूहात जाण्याच्या सीमेवर आहेत. दुसरं मला सगळ्यात जास्त काय आवडलं तर जोशींनी अनेक सो कॉल्ड औद्योगिकदृष्ट्या मागे असलेल्या म्हणजे धुळे, नांदेड, लातूर या शहरातील उद्योगांना पुस्तकात स्थान दिले आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे अनेक प्रकारचे उद्योग त्यांनी कव्हर केले आहेत. त्यात माझं आवडतं इंजिनियरिंग आहेच, पण फूड इंडस्ट्री, फर्टिलायझर, कन्स्ट्रक्शन, आर्किटेक्चर असे सर्व प्रकारच्या उद्योगाबद्दल पुस्तकात वाचायला मिळतं. 

मला या पुस्तकात खूप जास्त भावलेली गोष्ट म्हणजे ही सर्व नवीन पिढी परदेशात उच्च शिक्षण घेऊन भारतात परतली आहे आणि कौटुंबिक व्यवसायाला अजून जोमाने पुढे नेत आहे. 

त्यात अनेक इंस्पायरिंग टेक अवेज आहेत. मग त्यात बिझिनेस लॉस मध्ये जातोय असं दिसल्यावर तो वेळेत बंद करायची कथा आहे, करोना मध्ये व्यवसायात कर्ज झाल्यावर त्यातून कसे बाहेर पडले ती गोष्ट आहे, व्यवसायातील प्रॉफिट हा फक्त स्वतःच्या नव्हे तर व्यवसाय वृद्धीसाठी कसा वापरला याचे धडे आहे. 

ज्यांना कुणाला "व्यवसाय" या करिअर बद्दल, प्रक्रियेबद्दल जाणून घ्यायचं असेल, त्यांनी प्रत्येकांनी हे पुस्तक वाचावं असं मी आवर्जून सांगेन. पुस्तक वाचनीय झालं आहे. अर्थात दत्ता जोशींचा या विषयात हातखंडा आहे. त्यांची तब्बल ३० एक पुस्तकं या विषयावर प्रकाशित झाली आहेत. 

फर्स्ट जनरेशन इन्ट्रप्रेन्युअर ला बऱ्याचदा प्रतिकुलतेतून व्यवसाय उभा करावा लागतो. पण फॅमिली मॅनेज बिझिनेस मध्ये सेकंड जनरेशन ला अनुकूलता नेहमी पूरक असेलच असे नाही तर कधी ती मारक पण असते. त्यावर कशी मात करायची याचा वस्तुपाठ म्हणजे "मुव्हिंग ऍस्पिरेशन्स".

Tuesday 26 March 2024

नियमा

 नियमाच्या चौकटीत राहून काम करण्याचा आपल्याला इतका का तिटकारा आहे हे मला न उलगडलेलं कोडं आहे. अनेक साध्या गोष्टी आहेत जिथं नियम न पाळण्यात आपल्याला फार हुशारी वाटते. 

उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर सोसायटी मध्ये कुणाकडे पाहुणे आले तर त्यांची कार सोसायटी च्या बाहेर पार्क करायची, हा नियम. सोसायटी चा मेंबर विनाकारण वॉचमन शी हुज्जत घालत असतो की "मी सांगतोय ना, सोड गाडी." अरे, बाबा नियम केला आहे ना सोसायटीने. मग ऐक ना. 

सिंहगड रोडला पु ल देशपांडे गार्डनच्या अलीकडे टेकडी रस्त्याने गाडी उतरतात आणि बिनदिक्कत पणे रॉन्ग साईडने दत्तवाडीच्या चौकात येतात. परवा हाईट झाली. माझ्या ड्रायव्हर ने पिवळा लाईट असताना गाडी चौकात घातली आणि रॉन्ग साईड ने आलेल्या दोन स्कुटर मुळे त्याला रस्त्यात थांबावं लागलं. त्या स्कुटर पुढे गेल्यावर आमच्या गाडीसाठी रस्ता क्लिअर झाला पण तो पर्यंत आमचा सिग्नल लाल झाला होता. चौकात मधेच होतो म्हणून माझ्या ड्रायव्हरने गाडी पुढे घेतली. तर पूर्णपणे रॉन्ग साईडने आलेल्या एका कार ने आमच्या समोर ती उभी केली आणि खुणा करून सांगितलं की तुझा लाल सिग्नल आहे हे कळत नाही का? आता बोला. 

अनेक ठिकाणी मी बघितलं आहे की सेल्स डिपार्टमेंट ला नियम घालून दिले असतात की टूर वर असताना जो खर्च होईल त्याची बिलं घ्यायची आणि ती अकौंट्स डिपार्टमेंट ला सबमिट करायची. इतका साधा नियम आहे. पण तो सुद्धा सेल्स च्या पोरांना पाळता येत नाही. बिलं न देण्याची काहीही कारणं सांगतात. परत बदलत्या टेक्नॉलॉजी प्रमाणे ते मेंटेन करणं इतकं सोपं असतं, पण नियम तोडून काहीतरी वाद घालायची खुमखुमी असते. 

कुठलीही आस्थापना मग ती हौसिंग सोसायटी असो, काम करण्याची जागा असो, प्रवासाचे साधन मग त्यात रस्ता, रेल्वे, विमानप्रवास आला याचं चलन हे तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा आपण नियम आणि शिस्त पाळतो. ती तिथली कार्यसंस्कृती बनते. आणि एकदा आपली कृती संस्कृती बनली की सामाजिक प्रगती हे बाय प्रॉडक्ट बनतं. 

आपण सगळ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की नियम तोडणारे लोक नेहमी मायनॉरिटी मध्ये असतात. तर नियमाप्रमाणे वागणारे लोक मेजॉरिटी मध्ये. त्यांच्या चांगुलपणामुळे तुमचं चुकीचं वागणं हे खपून जातं, ते सर्फेस आउट होत नाही.  "कायदे मे रहो, फायदे मे रहो" हा एक सोपा मूलमंत्र आहे. कायदे, नियम हे आपल्यावर निर्बंध आणण्यासाठी केलेले नसतात तर एका शासनमान्य चौकटीत आपणा सर्वाना  मुक्तपणे जगता यावं यासाठी बनवले असतात हे ध्यानात ठेवलं तर आपलं जगणं तर सुसह्य होतंच पण आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आपल्या वागण्यामुळे आनंद मिळतो.  

Friday 22 March 2024

साथी हाथ बढाना!

साधारण १८०० च्या सुमारास जगातले सगळे मोठी शहरं ही रस्त्यावर पडलेल्या घोड्याच्या लीदीमुळे गुदमरत होती. कारण असं होतं की या शहरांच्या दैनंदिन जीवनातील लोक आणि वस्तूंचं दळणवळण हे हजारो घोड्यांवर अवलंबून होतं. सन १९०० मध्ये एकट्या लंडन मध्ये ११००० टांगे या कारणांसाठी काम करत होते. याशिवाय अनेक घोडागाड्या होत्या जिथे एका गाडीला खेचायला १२ घोडे लागायचे. असं मिळून लंडन शहरात दार दिवशी ५०००० घोडे काम करायचे. लंडन त्या काळातील जगातील सगळ्यात मोठं शहर होतं, जिथली जीव वस्ती साधारण पन्नास लाखाच्या घरात होती. आणि त्या सगळ्या शहराची जीवनरेषा जशी आज ट्यूब आहे तशी त्या काळात घोड्यांच्या मदतीने ओढली जाणाऱ्या अनेक दुचाकी वा चारचाकी ठेले होते. 

या घोड्यांच्या प्रचंड संख्येने अनेक प्रश्न उभे राहिले होते. त्यातील एक मोठा प्रश्न होता, घोड्यांनी रस्त्यावर टाकलेली लीद. सरासरीने एक घोडा दार दिवशी ६ ते १४ किलो विष्ठा रस्त्यावर टाकायचा, यावरून तुम्हाला प्रश्नाची व्याप्ती कळेल. आणि मग रस्त्यावर पडलेल्या या विष्ठेमुळे अनेक माशा व इतर कीटक लंडनच्या रस्त्यावर इतस्ततः पसरलेले असायचे ज्यामुळे टायफॉईड आणि इतर आजार पसरायचे. 

त्यात अजून प्रत्येक घोडा दिवसाला २ लिटर मूत्रविसर्जन रस्त्यावर करायचा आणि भरीसभर म्हणून या काम करणाऱ्या घोड्यांचं आयुष्य फक्त ३ वर्षे होतं. मृत घोडे रस्त्यावरून काढणे हे एक मोठं काम असायचं. बरं त्या बॉडीज ची विल्हेवाट लावणं सोपं व्हावं म्हणून बऱ्याचदा त्यांचे रस्त्यावरच तुकडे केले जायचे. 

एकंदरीत लंडनचे रस्ते त्याकाळात हे लोकांसाठी विषाचं आगर झालं होतं. 

बरं हा फक्त इंग्लंडचाच प्रॉब्लेम होता असं नाही तर न्यूयॉर्क मध्ये त्याच काळात साधारण लाखभर घोडे होते आणि ते साधारण दिवसाला पंधरा एक लाख विष्ठा विसर्जित करायचे. 

या प्रश्नाने लक्ष तेव्हा वेधून घेतलं जेव्हा १८९४ मध्ये एका ब्रिटिश वर्तमानपत्राने हेडलाईन दिली की "आजपासून ५० वर्षात लंडनमधील सारे रस्ते घोड्याच्या विष्ठेखाली ९ फूट गाडले गेले असतील."

"१८९४ मधील घोड्याच्या लिदीमुळे तयार झालेला भीषण प्रश्न" असं त्याचं वर्णन केलं गेलं. 

या भयानक परिस्थितीवर १८९८ साली न्यूयॉर्क मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय शहर नियोजनाच्या बैठकीत मोठी चर्चा घडली. पण या विचित्र प्रश्नावर उत्तर काही सापडलं नाही. इन फॅक्ट कुणी उघडपणे बोललं नाही, पण नुकताच उदयाला आलेल्या शहरी नागरसंस्कृतीचा ऱ्हास होईल अशी चर्चा दबक्या स्वरात चालू झाली. 

मानवी संस्कृतीच्या इतिहासात जेव्हा कधी अशी परिस्थिती आली तेव्हा गरज ही शोधाची जननी आहे ही उक्ती धावून आली आणि विचित्र परिस्थितीला उत्तर मिळालं आहे, याला इतिहास साक्ष आहे. या परिस्थितीला उत्तर आलं ते वाहन उद्योगाकडून. हेन्री फोर्ड नावाच्या ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या अर्ध्वयु ने चारचाकी वाहनांची मास प्रॉडक्शन सिस्टम आणली आणि पुढील एका दशकात "घोड्यांची रस्त्यावर विसर्जित झालेली विष्ठा" हा प्रश्न जगासाठी इतिहासजमा झाला. रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी घोडे खेचत असणाऱ्या सर्व दळणवळण साधनांना रिप्लेस केलं. 

इथं एक मेख आहे. मानवजातीला नेहमीच असं वाटत आलं आहे की आपल्याला प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे. पण ही खऱ्या अर्थाने शाश्वत उत्तरं नाही आहेत तर एक तडजोड आहे. एका शतकामध्ये ऑटोमोबाईल उद्योग नवीन प्रश्नाचा संच घेऊन आपल्यासमोर आ वासून उभा आहे. पण तो या लेखाचा विषय नाही. 

तर लिहीत होतो, की आजही लोकांना कुठल्या प्रश्नाचं उत्तर दृष्टीक्षेपात दिसलं नाही तर "the great horse manure crisis situation" हा वाक्प्रचार वापरला जातो. ते लोकांना हेच सांगण्यासाठी की निराश होऊ नका, काहीतरी सोल्युशन  निघेलच. 

यातला एक दुसरा इन्फरन्स असा आहे की भवतालात काय चुकीचं चाललं आहे हे सांगणारे अनेक रिसोर्सेस आहेत आणि ते दिवसरात्र आपल्या कानावर ती माहिती आदळवत असतात. दुर्दैव हे आहे की, बहुसंख्य लोक वाट बघत असतात की कुणीतरी देवदूत येईल आणि परिस्थिती बदलेल. जास्तीत जास्त आपण काय करतो तर एकतर तक्रारीचा सूर लावलेला असतो, नाहीतर निषेध व्यक्त करतो किंवा कुठल्यातरी माध्यमातून कन्सर्न व्यक्त करत असतो. पण त्यातून बदल घडत नाहीत. बदल आणण्यासाठी कृतीशीलता महत्वाची असते. 

अर्थात आशावाद जिवंत आहेच. समाजात एक असा प्रवर्ग आहेच जो रात्रंदिवस कष्ट करतो, समाजात उभे राहणाऱ्या अनेक प्रश्नांना उघडपणे आव्हान देतो, चिखलात अडकलेल्या चाकांना बाहेर काढण्यासाठी आपला खांदा हेन्री फोर्ड सारखे लोक बिनदिक्कत देतात आणि प्रश्नांची उकल करतात. ही लोक बदल घडण्याची वाट बघत नाहीत तर तो आणायचे ते कारण असतात. 

इथं प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. आपण फक्त बोलभांडगिरी करणारे बोलके पोपट राहणार आहोत की जो बदल मला हवा आहे तो करणारे कृतिशील नायक होणार आहोत? अजून एक चॉईस आहे. काही कारणाने आपल्या क्षमतेचा वापर करण्यात काही अडचण येत असेल तर जे प्रत्यक्ष काम करणारे हात आहेत त्यांच्या हातात हात मिळवत त्यांना बळ देण्याचं काम तर आपण नक्कीच करू शकतो. 

साथी हाथ बढाना!


- मूळ इंग्रजी लेख श्री गुरविंदरसिंग यांचा आहे. 

Tuesday 5 March 2024

Maharshtra

  


THE SOONER WE WAKE UP, THE BETTER! 


This had been brewing, or should I say churning inside me for quite a while, and the desire to write about it was getting stronger by the day. But there would be moments when I would simply want to scrap the idea, doubting if it would be of any use at all and end up just being a futile cry in the dark. But when I saw my own beloved state of Maharashtra being ridiculed in another state, I knew I had to have a hearty vent-out 


So, the powers that be in Maharashtra, it’s high time you stopped the mockery that you have been perpetrating in the name of politics, for the common man is getting mauled in the process! 

 

There was a time when just belonging to Maharashtra used to draw respect and admiration. Here is a little example. A few years ago, my friend Hemant had come from Gujarat to Pune for a job, and he had said “Wow, the people here are so talented and hardworking!” Though he as merely stating a fact, I can’t help but wonder why Maharashtra couldn’t attract big business projects. Can you please check and let me know how many projects with significant employment potential have been brought to Maharashtra in the past few years? The Tatas who commenced their conglomerate in Jamshedpur, and then went on to put up their next big plant in Pune, have carried out all their expansion out of Maharashtra. They moved to Singur with the Tata Nano, and upon stubbing their toe on Mamata Banerjee’s obstinacy one would have thought that the plant would come to Maharashtra, but that wasn’t to be. It went to Sanand in Gujarat instead, where they are producing their EV’s in full swing. Their march in Gujarat doesn’t end here, for they were quick to acquire the 300 acres out of the 430 that Ford had vacated in the neighbourhood. This venture is all set to become the biggest EV plant in the sector.  The fact that despite having the Tata Aerospace factory in Mihan, Nagpur, the Tata Airbus project shifted to Vadodara underlines my concern here.    


 

Even the great Mumbai that the Danish Engineers Henning Holck-Larsen and Soren Toubro were enamoured with, so much so that they made it the home for their Larsen & Toubro, a giant name in every sense, couldn’t retain any of the subsequent major projects undertaken by L & T and they all went out of Maharashtra. Today, the sight of the sprawling establishment of L & T at Hazira is awe-inspiring to say the least. They took the rest of their projects to Bengaluru and Chennai, by the way…  


The legendary Dhirubhai Ambani launched his great journey from Mumbai and put up a plant in Patalganga, but all the subsequent projects with huge employment opportunities went to Hazira and Jamnagar.  

 

All the Sunrise Industry plants from the Aerospace are shifting to Hyderabad, Kolar, Bengaluru…  


The hugely ambitious announcement by Foxconn, the Cell-phone makers, of their upcoming plant in Talegaon and the proposed investment of a whopping 25000 crores too met the same fate and the whole project tiptoed away to Hossur, from right under the noses of Maharashtra’s political leadership. Following Foxconn's lead, Tata Electronics, Rising Star, Salcomp, Dixon Technologies, Vistron, and many others relocated and are now operating at full capacity, generating job opportunities for thousands. Kia Motors has found its new home near Anantpur while Ola and Ether found theirs in   Bengaluru and Hossur respectively.  Despite talks of a railway plant coming to Latur, major developments in the Vande Bharat initiative are primarily occurring in states other than Maharashtra. It has been two years since General Motors shut down their operations in Talegaon, and despite Hyundai's ambitious takeover of GM, the company is encountering numerous challenges. 


Both the people and politicians of Maharashtra appear unaware that their combined productivity and perspective are becoming ensnared in unproductive pursuits and endeavors. If the trend of renaming cities had to begin, it should have started with Ahmedabad. Instead, the city is thriving with the establishment of prestigious institutions like the IIT and IIM, as well as new plants by Maruti Suzuki and Honda Motorcycles. As Ahmedabad thrives in generating significant material and intellectual wealth, Maharashtra is caught up in the emotional fervor of renaming its cities to historical appellations. The Government too follows suit and pats itself on the back for this perfectly inconsequential change. While the Aurangabad in Bihar is ignored conveniently, but the Usmanabad in Maharashtra doesn’t escape their attention. While local political power typically drives regional progress, Pune stands as a glaring exception to this norm. Despite being the top revenue-generating city in Maharashtra, its Metro project advances at a sluggish pace" In stark contrast, Metro projects in low-trade regions are executed rapidly, yet run trains that are often near-empty. And even after a decade and a half, the Pune Airport remains 'in talks'. In the same period, the ultra-modern Bengaluru Airport is not only off and running, but its second terminal too has started operations in full swing. Apart from a project or two, the Khed SEZ remains largely inactive. In contrast, Bengaluru boasts an Industrial Machine Park and a sprawling 1200-acre Japanese Industrial Park under development.

 

The least is said the better about roads and highways. Once known for its excellent roads, Maharashtra now suffers from the opposite.  


Having said all this, I wouldn’t jump to the conclusion and assert that everything is hunky-dory with the other states. However, the damage caused by those in power, in general, renders the scenario pathetic, to say the least. It brings me more shame and embarrassment than anger. This doesn’t imply, of course, that only present-day politicians or a particular party are responsible for this. It's the culmination of degradation that has been ongoing for the last couple of decades or so. Our beloved Maharashtra of today seems fated to be compared with a cesspool of consequences resulting from narrow-mindedness, corruption, deeply rooted casteism in the leaders elected by us, a working class that lacks both spine and resources to stand up against it all, and finally, a collective society that identifies more with caste and religion than with anything profound. 

 


It is still not too late, though. Let’s look at the silver lining, shall we? Maharashtra still tops the GDP scale. It is the biggest contributor of the GST. All we need to restore its rightful old glory and make the rest of India sit up and take notice is to shed the lethargy from our psyche and channel it towards its full potential. That will mark the beginning of a future day when we can salute Maharashtra with the same pride that we have come to associate with it. 


The time to start is NOW! 

Sunday 25 February 2024

अमोल

 काय होतं की बरेचदा भवताल तुमच्या व्यक्तिमत्वाला पूरक असतं आणि व्यावसायिक यश तुम्हाला मिळतं. तुम्हाला वाटतं की दुनिया मेरी मुठ्ठीमें. पण अंगभूत हुशारी असूनसुद्धा केवळ दैव साथ देत नाही आणि सोशल इको सिस्टम ची फार मदत होत नाही आणि त्यामुळेच तळ्यातील अनेक  बदकांपैकी तो मात्र कुरूप म्हणून ओळखला जातो. शिक्षणात तो बी इ इलेक्ट्रॉनिक्स होतो. आयुष्याच्या ज्या काळात उमेदीने करिअर घडवण्याची संधी आणि उमेद असते त्याच काळात त्याला मानसिक आजार होतो. जिथं स्वतःचं करिअर उभं करायचं म्हणून कामात गुंतून घ्यायचं त्या वयात त्याला हॉस्पिटल च्या वाऱ्या कराव्या लागतात. त्या सगळ्या वावटळीच्या आयुष्यात तो बरा पण होतो आणि संसार करण्यासाठी सज्ज होतो. पण तसं घडायचं नसतं. त्याचा तो संसार मोडतो. परत तो मानसिक आजाराच्या गर्तेत लोटला जातो. त्याही संकटाला परत तो धैर्याने तोंड देतो. आर्थिक अस्थैर्य तर होतंच, पण तो आल्या दिवसाला तोंड देत पुन्हा एकदा उभा राहण्याचा प्रयत्न करतो. साथ देणारी मिळते, त्यांच्या संसारवेलीवर एक फुलही उमलते. त्याची नोकरीतील कारकीर्द पण स्थिरता देऊ लागते. 

पण नियती पुन्हा एकदा क्रूर धक्का देते. एका विचित्र अपघातात तो त्याची पत्नी आणि ते फुल गमावतो. 

एखादा अशा एका पाठोपाठ येणाऱ्या संकटाने कोलमोडून गेला असता. पण वरकरणी अत्यंत अस्थिर आयुष्य जगणारा तो बहुधा आतून खूप स्ट्रॉंग होत जात असावा. 

हळूहळू शैक्षणिक क्षेत्रात तो आपलं बस्तान बसवू लागतो. कुठून त्याच्या अंगात शक्ती येते हे माहीत नाही पण २०१७ साली तो शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद इथून वयाच्या ४१ व्या वर्षी एम इ इलेक्ट्रॉनिक्स होतो. 

प्रोफेसर म्हणून आता स्थिर स्थावर होत असतानाच पुन्हा एक संकट पुढे दत्त म्हणून उभं राहतं, करोना. परत त्याची नोकरी जाते. 

पण एव्हाना संकटाशी दोन हात करण्याची त्याला बहुधा सवय झाली असावी. आता त्याची शैक्षणिक प्रतिभा फुलत होती. औरंगाबादच्या एका चांगल्या इंजिनियरिंग कॉलेज मध्ये तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग चा प्रोफेसर म्हणून काम करू लागतो. 

ही स्टोरी आहे माझा मावस भाऊ अमोल देवडे याची. का कुणास ठाऊक या मावस मामे भावांच्या मनात माझ्या बद्दल एक विचित्र भीती होती असं ते आज सांगतात. पण तीन चार वर्षांपूर्वी ती भीती गेली आणि अमोल माझ्याशी संवाद साधू लागला. त्याला त्याच्या करिअर मध्ये काही प्रश्न उभे राहिले तर तो मला प्रत्यक्ष भेटीत किंवा फोन करून विचारू लागला. मी सुद्धा त्याला यथाबुद्धी उत्तरं देऊ लागलो. मानसिक आजार अधून मधून डोकं वर काढत होताच. त्याला मी एकदा व्यायामाचं महत्व सांगितलं. तो तेव्हापासून दररोज सकाळी फिरायला जातोच. एकदा मला म्हणाला “दादा, तू कसला फिरतोस रे. एकदा मला पण ने की” आम्ही दोघांनी मिळून त्याचा औरंगाबाद-पुणे-दिल्ली-हैद्राबाद-औरंगाबाद असा ट्रॅव्हल प्लॅन बनवला. त्याने खूप प्रश्न विचारले अगदी मला कंटाळा येईपर्यंत. तिथेही मी त्याला जमेल तसं त्याच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला. 


मागच्या महिन्यात त्याने फोन करून आश्चर्याचा सुखद धक्का दिला. त्याने सांगितलं “दादा, मी इलेक्टरो मॅग्नेटिक्स या विषयावर पुस्तक लिहिलं आहे”. शप्पथ सांगतो, मला शंका आली की याचा मानसिक आजार परत उद्भवला आहे. प  यावेळेस माझी शंका खोटी ठरली याचा मला प्रचंड आनंद झाला. आणि त्याने सांगितलं की गेले आठ दहा वर्षे तो या पुस्तकावर काम करतोय. त्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते व्हावं अशी त्याने मला गळ घातली. मी नाही म्हणायचं कारणच नव्हतं. एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला नमस्कार करतो तसा मी त्याला मनोमन नमस्कार केला. काल एका हृदयांगम घरगुती सोहळ्यात त्याच्या पुस्तकाचं विमोचन झालं. 

कॉलेजमध्ये तरुणाईशी संवाद साधताना मी वयानुरूप करिअर कसं बिल्ड करावं यावर बोलताना अपवाद म्हणून बोमान इराणी किंवा के एफ सी च्या कर्नल सँडर्स चं उदाहरण देतो. यापुढे ४८ व्या वर्षी जीवनाला कलाटणी देणाऱ्या अमोलचं उदाहरण देणार आहे. 


इतके वर्ष जग ज्याला कुरूप बदक म्हणून ओळखत होतं तो खऱ्या अर्थाने राजहंस निघाला याचा मला खूप आनंद होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करत त्याची अजून पुस्तकं येवोत आणि या पुढील अमोलचं आयुष्य आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि सामाजिक या सर्वच क्षेत्रात स्थिर आणि भरभराटीचे जावो या हार्दिक शुभेच्छा तर मी देतोच आहे पण तुम्हा सर्वांना पण त्या देण्यासाठी नम्र आवाहन करत आहे.